शिवरात्री — परमात्म्याचा दिव्य अवतार
सर्व महान विभूतींच्या स्मरणार्थ स्मारक चिन्हे, मूर्ती किंवा मंदिरे उभारली जातात. परंतु जगातील सर्व मूर्तींमध्ये सर्वाधिक पूजनीय शिवलिंग आहे. जगात असा क्वचितच एखादा देश असेल जिथे शिवलिंगाची पूजा कोणत्या ना कोणत्या रूपात होत नाही.
‘शिव’ या शब्दाचा अर्थ आहे — कल्याणकारी, आणि ‘लिंग’ म्हणजे प्रतीक किंवा चिन्ह. म्हणून शिवलिंगाचा अर्थ झाला — कल्याणकारी परमपिता परमात्म्याचे प्रतीक.
प्राचीन काळात शिवलिंग हिर्यांपासून बनविले जात असे, कारण परमात्म्याचे स्वरूप ज्योतीस्वरूप आहे. सोमनाथाच्या प्रसिद्ध मंदिरात जगातील सर्वप्रथम हिर्यापासून बनविलेल्या शिवलिंगाची स्थापना झाली होती. विविध धर्मांमध्येही परमात्म्याला याच स्वरूपात मान्यता दिली गेली आहे.
भारतामध्ये शिवाचे बारा ज्योतिर्लिंग प्रसिद्ध आहेत — हिमालयातील केदारनाथ, काशीतील विश्वनाथ, सौराष्ट्रातील सोमनाथ, मध्यप्रदेशातील उज्जयिनीतील महाकालेश्वर इत्यादी.
परमात्म्याचे कार्य आणि त्रिदेवांची रचना
कोणत्याही महानतेचे मूल्य कार्यावरून ठरते. परमपिता परमात्मा शिव संपूर्ण सृष्टीचा पिता आहे, म्हणून त्याचे कार्यही कल्याणकारी आहे.
जर सर्व कर्म परमात्माच करीत असेल, तर चांगले-वाईट कर्म आत्म्यांना का भोगावे लागते? कारण प्रत्येक आत्मा स्वतंत्र आहे. परमात्मा कोणालाही कर्म करण्यास भाग पाडत नाही.
ब्रह्मा, विष्णू आणि शंकर या तीन सूक्ष्म देवता आहेत, पण परमात्मा नाहीत. त्यांचा निर्माता शिव आहे. शिव आणि शंकर एक नाहीत.
तीन लोकांची संकल्पना
परमात्म्याला त्रिमूर्ती, त्रिनेत्री, त्रिकालदर्शी असे म्हटले जाते, म्हणून तीन लोकांचे अस्तित्व आवश्यक आहे.
- स्थूल लोक (मनुष्यलोक) — जिथे आपण राहतो.
- सूक्ष्म लोक — ब्रह्मा, विष्णू, शंकर यांच्या लोकांचे स्थान.
- परमधाम (शांतीधाम) — आत्म्यांचे मूळ निवासस्थान.
परमधामात ना दुःख आहे, ना सुख; ती शांत अवस्थेची जागा आहे.
शिवरात्री — परमात्म्याचा दिव्य अवतार
जेव्हा मानव पाच विकारांमुळे दुःखी, अशांत आणि भ्रष्ट होतो, तेव्हा परमात्मा शिव अवतार घेतो. तो आत्म्यांना ज्ञान, योग आणि पवित्रतेद्वारे जागृत करतो.
याच दिव्य अवतरणाची स्मृती म्हणून शिवरात्री साजरी केली जाते. शिव म्हणजे मस्त योगी नसून कल्याणकारी परमात्मा आहे. खऱ्या अर्थाने ‘मस्ती’ म्हणजे परमात्म्याच्या ज्ञानातून मिळणारा आनंद.
सर्व मानवात्म्यांना हार्दिक ईश्वरीय निमंत्रण आहे की त्यांनी शिवरात्रीचे खरे रहस्य समजून घेतले पाहिजे, विकारांपासून मुक्त होऊन पवित्र जीवन जगावे आणि येणाऱ्या सतयुगी दिव्य जगात देवपद प्राप्त करावे.
मराठी वृत्तसेवा – www.BkMahaMedia.com




Leave a Reply